Progress with Tradition.
- Smita Bhagwat
- Jul 31, 2020
- 2 min read
Updated: Jul 31, 2020
श्रावणात स्मरा हो पूर्वजांच्या आदर्शांना....
श्रावण महिना म्हणजे केवळ सणांचा उत्सव नव्हे! त्या सणांच्या निमित्ताने आदर्शांचे स्मरण करून ते आचरणात आणण्याचा निर्धार करण्याचाही हा महिना! मानसिक उत्कर्षाचा विचार ध्वनित करणारा! वैचारिक जागर करण्याचा! आज श्रावणी शुक्रवार! मुलांचे कल्याण इच्छिणाऱ्या मातांनी अपत्यकल्याणासाठी हा विचार लेकरांना द्यावा. हल्ली जाता जात नाही ती जात असा नैराश्यसूचक विचार पेरून सत्तालोलूप राजकारण्यांमुळे जीवन नासले आहे. पण मातेत विरसल्या जीवनाचा कलाकंद करण्याचे सामर्थ्य असते. सुमातांनी मुलांना जातीचा खरा अर्थ समजावला तर हे जग सुंदर होईल. हा खरा आदर्श विचार! तेव्हा जात कर्मा वरून ठरत असे, जन्मावरून नाही .
वेश्यागर्भ समुत्पन्नो वशिष्ठश्च महामुनी: ! दासीगर्भ समुत्पन्नो नारदश्च महामुनी: ! कैवतीगर्भ समुत्पन्नो व्यासश्च महामुनी: ! क्षत्रियगर्भ समुत्पन्नो विश्वामित्रो महामुनी: ! शृंगीगर्भ समुत्पन्नो ऋष्यश्रृंगो महामुनी: ! कुम्भीगर्भ समुत्पन्नो अगस्त्यश्चैव महामुनी: ! शूद्रागर्भ समुत्पन्नो कुशकश्च महामुनी: ! तपस्याद ब्राह्मणो भूयात् तस्माज्जातिर्न कारणम् !
म्हणजे वेश्येच्या गर्भातून उत्पन्न झालेले वशिष्ठ महामुनी
दासीच्या गर्भातून जन्मलेले नारद महामुनी
कोळीणीच्या गर्भातून उत्पन्न झालेले व्यास महामुनी
क्षत्रियगर्भोत्पन्न विश्वामित्र महामुनी
हरिणीच्या गर्भातून उत्पन्न जन्मलेले ऋष्यश्रृंग महामुनी
कुंभ (मडके) गर्भोत्पन्न अगत्स्य महामुनी
शुद्र गर्भोत्पन्न कुशक महामुनी
हे सर्व अतिशय मेहनत करून तपस्याबलावर ब्राम्हण बनले... जाती मुळे वा आरक्षणामुळे नव्हे.
हल्ली सत्तालोलूप मंडळी 'तोडा आणि राज्य करा' ('डिव्हाईड अँड रुल') ही ब्रिटीशांची (अ) नीती इंग्रजांहून अधिक आत्मसात करून सवाई इंग्रज बनली आहेत. आधी आर्य अनार्य यांच्यात भांडणे लावून मग जाती-उपजातीत आकस निर्माण करून सुखाने राज्य करत आहेत. वास्तविक आर्य म्हणजे सुसंस्कृत! ऋग्वेदात आर्य हो असा सर्वोत्तम आशीर्वाद आहे. म्हणजे मानवाने अधिकाधिक सुसंस्कृत व्हावे, ही सुप्त इच्छा या आशीर्वादात दडलेली आहे. तरी स्वार्थी राजकारणी मानवजातीस छोट्या पोटजातीत विभागून आरक्षणाचा अतिरेक करत आहेत. वर महात्मा गांधींचा हवाला देण्याचा शहाजोगपणा करत आहेत. पण गांधीजी मागासवर्गास पंचवीस वर्षे सवलती द्याव्या असे म्हणाले होते. ते नजरेआड करून स्वातंत्र्य मिळाल्याची घटना पंचवीसच्या तिप्पट वर्षे होणे नजरेच्या टप्प्यात आले असूनही सत्ताप्रेमी स्वार्थापोटी जात नामक गोष्टीचा बाऊ करत समाजात अधिकाधिक फूट पाडत आहेत.
स्वामी विवेकानंद म्हणत, - 'समाजाचे स्तर दुष्टांच्या कारवायांमुळे नव्हे तर सज्जनांच्या क्रियाहीन तटस्थतेमुळे खाली जाते!' सुजाणांनी श्रावण मासात हा वसा घ्यावा. इतरांना वास्तव सांगून आदर्श विचाराचा प्रसार करावा. 'त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोसि' या पूर्वजांनी दिलेल्या विचारांची कास धरून कोविडचा प्रश्न आज ना उद्या सुटेल. पण जातीच्या प्रश्नाचे निराकरण त्याहूनही अधिक जटिल आणि गरजेचे आहे. त्या संदर्भातील सत्य विचार पुढच्या पिढीस दिला तर कोविड१९च्या आधीपासून सत्ताधिशांनी बागुलबोवा ठरवलेला जातीचा प्रश्न सुटेल. हे काम करण्याची क्षमता असते सुमातेत! मातेचे बोट धरून भावि पिढ्यांनी ज्ञानाची कास धरली तर साने गुरुजींनी व्यक्त केलेली 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो...' ही सदिच्छा पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. मग आपण सर्वार्थाने 'श्रावण मासी हर्ष मानसी...' म्हणू शकू.
विचार करा नि तो आत्मसात करण्याचा निर्धार करा.
शुभं भवतु


अगदी खरे. यासाठी सर्वप्रथम आपले साहित्य पायाविहिन होते हा पाश्चात्यांनी निर्माण केलेला गैरसमज पुसून पूर्व आणि प्चमेच्या योग्यविचारांची सांगड घातली पाहिजे.
माझ्या मते या सर्व विकसनशील प्रणाली आहेत म्हणून आवश्यक असताना त्या पुन्हा पाहिल्या पाहिजेत. नियम पुन्हा कधी लिहायचे हे कोण ठरवतो हा एकच प्रश्न.
आभार. मला मनापासून असे वाटते की माझ्या हयातीत जातीभेद नष्ट होऊन आरक्षण मागण्याची वृत्ती नष्ट व्हावी. विकसनशील म्हणवणाऱ्या आपल्या देशात सारेच आम्हा माहासवर्गीय आहोत आम्हाला आरक्षण द्या, असे म्हणतात, याचेे मला नवल वाटते तितकेच करुणही वाटते. कपणालाही प्रगती करू न देता खाली खेचण्याची खेकड्याची वृत्ती का आत्मसात करण्यात येत आहे, याचा मला उमज पडत नाही.
श्रावण महीन्याचे महत्व वेगळ्या रीतीने म्हणजे बदलत्या काळास पूरक होईल असे छान रीतीने लिहिले आहे. मानवाची जात त्याचा कर्मावरुन ठरावी. तोच जात ठरवायचा याेग्य मापदंड आहे. पालकांनी आपल्या आपत्यांना चांगले संस्कार देणे याेग्य ठरेल. योग्य संस्काराचा आढावा घेण्यास श्रावण महिना साजरा करणे ठरवावे.