Smrutigandh
- Smita Bhagwat
- Apr 25, 2021
- 2 min read
स्मृतीच्या शिपलीतून.....
राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त हनुमानाचा जन्म त्याचे फलित! भगवंताने सदैव भक्तीची कदर केली. हरीभोवती नित्य नाचतो भक्तांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा वगैरे भक्तीगीतात त्याचे वर्णन आपण ऐकतो, वाचतोही. यासाठी चैत्र नवरात्राचा उत्सव रामनवमी होताच आटोपता न घेता खूप ठिकाणी हनुमान जयंतीपर्यंत साजरा करतात. हरीभक्तांचे स्मृतीगान करून त्या निमित्ताने अनायस काही वर्षांपूर्वी एका संदर्भात अनायासे घडलेले मुक्तक सादर करावेसे वाटलेे!
हरी भक्तीचा भुकेला असे आपण म्हणतो. हरी म्हणजे भगवान विष्णू! प्रत्येक अवतारात भगवताने स्वतःहून भक्तांना अधिक महत्व दिलेे! नित्य भगवत सतत भक्तांच्या मेळ्यात रमलेे! त्यांनी नामदेवाकडून घास भरवून घेतलाे! पहाटसमयी जनाबाईस दळण दळलेे! ते द्रौपदीस वस्त्र पुरवणारे! एकनाथांचा दास होऊन चंदन घासणारे! कबिराचे शेले विणणारे! सुदाम्याचे पोहे नि विदुराच्या कण्यांचा प्रेमाने स्वीकार करणारे! भगवंत आणि भक्तांचे किस्से! त्यात रामावतारात शबरीची उष्टी बोरे चाखण्याचा किस्सा अग्रभागी! शबरीच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी नकळत घडलेले मुक्तक आज सादर करा.चे आहेे. तेच हे ....
समुद्र शबरी धरणी राम!
विद्वान म्हणतात - वसुधेवर आहे तीन भाग समुद्र आणि एक भाग जमिनीचा! तसाच आहे अजून एक अनुपात. मानव देहात आहे, तीन भाग पाणी नि एक भाग अस्थी आणि स्नायुंचा! हृदय धडकतं जशी असते समुद्राची गाज, असेल का ती सागराची भाषा की धरेच्या हृदयाची धडधड? वास्तविक समुद्राचं पाणी खारट असतं, मग त्यानं धरणीला दिलेलं दान का गोड असतं? खरंच सागरजलानं बनलेल्या ढगात का बरं खारं पाणी नसतं? मानत असेल का समुद्र धरणीला राम? असेल का शबरी सागरमनात दडलेली? चाखून गोड बोरं रामास देणारी शबरी आणि खारेपण स्वतःकडे ठेऊन धरेसाठी मेघ घडवणारा रत्नाकर
असतील का एका जातीचे? आज वाटतंय, आहेतच ते एका जातीचे.
समुद्र शबरी धरणी राम, खरंच समुद्र शबरी आणि धरणी राम युगायुगांपासून चालू आहे ही कहाणी अविराम! ही कहाणी अ-विराम!!
१५ नोव्हेंबर २००७
सर्व भगवंत भक्त आणि संतांना वंदन.
शुभम् भवतु.


Comments