Vechalele moti 4
रामराज्यातील मोती.
अयोध्येत रामराज्य आले. पुढे रामावतार आणि द्वापारयुगही संपले. कलीयुगात रामराजाची नि रामराज्याची उपमा सर्रास वापरण्याचा निर्लज्जपणा घडत होता. सीतेने कलीयुगात काय होईल, असे रामास विचारले, त्या प्रश्नाचे उत्तर सूचित करणाऱ्या भजनातील निवडक ओळींचे स्मरण व्हावे असा!
'रामचंद्र कह गये सीयासे ऐसा कलजुग आएगा, हंस चुगेगा दाना तिनका कौवा मोती खायेगा।।
राजा और प्रजामें होगी निसदिन खींचा-तानी जिसके हाथमें होगी लाठी भेंस वही ले जायेगा।।
कलयुगमे धन और मन काले होंगे, चोर उचक्के नगरसेठ और प्रभुभक्त निर्धन होंगे.
लोभी-भोगीही जोगी कहलायेगा...'
या कवनातील वेळ कधीच साकार झाल्याचे सांगण्यास माझी आई एक अख्यायिका सांगत असे...
कलीयुग कधीच सुरू झाले होते. आर्यावर्तात एक राजा रामासारखा सत्यप्रिय नि निस्पृह असल्याचा तोरा मिरवत होता. आपल्या राज्यास रामराज्य नि मंत्रीमंडळास तो निर्मोही म्हणत असे. त्अयाच्शाया दरबारात एकदा साक्षात श्रीरामाने मानवी वाचेत बोलण्याचा वर दिालेले कबूतर आले. श्रीरामाने त्यास विशिष्ठ काळ काही मोती सांभाळण्याचा आदेश दिला होता. त्या काळात खऱ्या अर्थाने रामराज्य निर्माण झालेले दिसल्यास ते मोती त्या राजास सुपूर्द करून वा तसे न घडल्यास मोत्यांसह स्वर्गास येण्याचा त्यास आदेश होता. तो काळ संपत आल्याचे सांगून कबूतर म्हणाले, "आपले राज्य रामराज्य असून मंत्री निर्मोही असल्याची तुला खात्री वाटत असेल तर महत्वाच्या मंत्र्यांना माझ्यासंगे पाठव. त्याच्याहाती मी ते मोती पाठवीन!" राजाने छाती फुगवून आपले राज्य रामराज्य असल्याची खात्री व्यक्त केली.
पाच मंत्री कबूतरासंगे अयोध्येस गेले. चकचकीत पितळी घंटा ठेवलेल्या ठिकाणी थांबून कबूतराने घंटा उचलण्याचा आदेश दिला. घंटेखाली रामराज्यातील मोती झगमगत होते. प्रधानास मोती राजाच्या सुपूर्द करण्याची विनंती करून कबूतराने सर्वांना निरोप दिला. मंत्रीमंडळ दरबारात परतले. प्रधानाने राजासमोरील तबकात दोन झळझळीत मोती ठेवले. तेजस्वी मोती पाहून राजाचे डोळे दिपले. त्याने आनंद व्यक्त करताच कबूतर प्रगटले. मोती नेण्यास!
"ना तू रामासम राजा की तुझे मंत्री निर्मोही!" असे तेे स्पष्ट म्हणाले. राजा मोती देईना. म्हणून कबूतराने त्यास मोत्यांची चित्तरकथा ऐकवली...
"एकदा रामराज्यातील नागरिकास मोती सापडले. त्या वेळी श्रीरामाची प्रजेची सुखं-दुःखं जाणण्यास फेरी चालू होती. सेवक घंटा वाजवत प्रजाजनांना राजाच्या आगमनाची सूचना देत होता. मोती सापडलेला नागरिक नम्रपणे पुढे होऊन श्रीरामास म्हणाला. "मला हे मोती सापडले. ते आपण ज्याचे त्याला द्यावे, अशी विनंती आहे!"
जे आपले नाही त्यास स्पर्श न करण्याची रघुकुलाची रीत! म्हणून प्रभुंनी सेवकास ते मोती घंटेने झाकण्याचा आदेश दिला. नगरीत दवंडी पिटण्याचाही.... "सापडलेले मोती घंटेखाली आहेत. ज्याचे असतील त्याने ते न्यावे!"
"बरीच वर्षे झाली तरी त्या मोत्यांवर हक्क सांगायला कुणी आले नाही. अवतार समाप्तीची वेळ समीप आली. रामप्रभुंनी मला मोती सांभाळण्याचा आदेश नि वाचेचे वरदान दिले, आदेश मी तुला सांगितलाच आहे! तुझे राज्य खऱ्या अर्थाने रामराज्य नसल्यानं, या मोत्यांवर तुझा हक्क नाही!" रागावलेल्या राजाने आपले राज्य रामराज्यच आहे, असे ठासून सांगितले. कबूतर उपहासाने हसले. निर्मोही म्हणवणाऱ्या मंत्र्यांकडे बघत म्हणाले, "श्रीरामाने आपले नसलेल्या मोत्यांना स्पर्श केला नाही. तू लगेच ते घेतले! वास्तविक घंटेखाली बारा मोती होते. तुझ्या निर्मोही (?) मंत्र्यांनी संगनमत करून दोन दोन मोती बळकावले!" चोरी पकडली गेल्याने, मंत्र्यांनी आपापल्या खिशातले दोन मोती राजासमोरील तबकात ठेवले. कबूतर पुढे म्हणाले, "तू विनाविरोध मोती स्वीकारणारा! तरी आपले राज्य रामराज्य असल्याची बढाई मारणारा! रामराज्यातील सामान्य नागरिकास बारा मोत्यांचा मोह पडला नाही. तूा नि तुझे मंत्री दोन मोत्यांवर लोभावला. धर्मास मुरड घालण्यास राजकारण म्हणणाऱ्या श्रीकृष्णाच्या काळी कुणी स्वतःस राम म्हणवून घेतले नाही! आणि तू... असो! मला नेमून दिलेला काळ संपला आहे. निघतो मी!"
साऱ्याची नजर शरमेने झुकली. कबूतर उडाले. पंखांची फडफड थांबल्यावर, साऱ्यांनी वर बघितले. राजासमोरील तबकातील मोती, लायक व्यक्ती न गवसल्याने अदृश्य झाले होते.
रामराज्य झालेले बघण्याची कबूतरास संधी नाही मिळाली. त्याने आशा सोडली. पण भारतीयांना आशा सोडून चालणार नाही. सत्तरहून अधिक वर्षे चांगले दिवस येण्याची चिरंतन आशा बाळगून जगलेल्या सज्जनांनी प्रार्थना करावी, येत्या रामनवमी पर्यंत साऱ्यांनी करोनाने शिकवलेला पाठ आत्मसात केलेला असावा. भ्रष्टाचार सरण्याची सुरूवात होऊन प्रजेत खरा सर्वधर्म समभाव निर्माण झालेला असो.
शुभम् भवतु.


Comments