Sister of Shree Ram
- Smita Bhagwat
- May 27, 2020
- 2 min read
रामायण
कोविड19 च्या संदर्भात अजीर्ण होण्याइतकी माहिती कोसळते आहे. पूर्ण युगात घडले नाही असे अकल्पनीय घटीत जगास कवेत घेत आहे. त्याने समस्त विश्व बधिर केले आहे. विश्व युद्धाने पूर्ण जगास नव्हता विळखा घातला! कोणत्याही दहशतवाद्याने या अर्ध सजीव जिवाणुइतकी दहशत फैलावली नव्हती. अणुबाँबचे सामर्थ्यही या इटुकल्या शत्रूच्या पासंगास पुरणारे नव्हते! इवल्या कोविडची सावली पूर्ण जगास कवेत घेऊन भयभीत करणे अकल्पनीय असल्याने समस्त जग घर नामक तुरूंगात बंदी बनले आहे. कायद्याने नि भयामुळे! ही बंदीशाळा ग.दि.मा.च्या 'जग हे बंदीशाळा,' या काव्यासारखी मोहक नाही.
कामामागे धावण्याची सवय असलेल्या मानवास अचानक कोसळलेला रिकामा वेळ झेपणार नाही. त्याच्या मनात दडलेला सैतान उचल खाईल! म्हणून जनतेस गुंतवण्यास दूरदर्शन रामायण, महाभारत, वगैरे गाजलेल्या मालिकांचे पुन्हा प्रसारण करत आहे. रामायण त्रेतायुगात नि महाभारत द्वापारयुगात घडले. आपण जगत असलेल्या कलियुगाची काही सहस्त्रके सरली आहेत. या मालिका प्रथम प्रसारित झाल्या तेव्हा, मला वाटले की काळात परिवर्तन होत असते. हजारो वर्षांपूर्वी या फॅक्ट बेस्ड फिक्शन प्रकारातील ग्रंथांची निर्मिती झाली. त्यांचा वर्तमान दृष्टीकोनातून विचार करावा. म्हणून विसाव्या शतकातील स्त्रीच्या - माझ्या दृष्टिकोनातून महाभारतातील स्त्री पात्रांचे निरीक्षण परिक्षण करणारी लेखमाला मी गुजराथी साप्ताहिकात लिहिली. पुढे त्याचे पुस्तक झाले. हल्ली लादलेला रिकामा वेळ कंटाळा जनक ठरू नये, यासाठी होणारा स्तुत्य उपक्रम पाहून जुन्या विचारास नवा अंकुर फुटला. हे पौराणिक कथांचा वापर अफूच्या गोळीसारखा करणे आहे! या ग्रंथांचा वर्तमान नजरेतून समांतर विचार झाल्यास मस्तक कार्यरत होईल. त्यामुळे कदाचित भय ओसरेल. तसा प्रयत्न करण्यास मला ब्लॉगवर चर्चासत्र सुरू करावी असे वाटले. विषयप्रवेशाचा लेख मोठा झाला तरी पुढे चर्चेचा मुद्दाच ब्लॉगवर असेल.
आधी रामायण निर्माण झाले. म्हणून तिथून सुरू करू. ढोबळ कथानक टाळून ग्रंथात दबल्या-दडल्या बाबींचा विचार करू. राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञानंतर चार पुत्र झाले, हे सारे जाणतात. पण त्याच्या खूप आधी कौसल्येने शांता नामक कन्या प्रसवल्याचे, मोजके लोकच जाणतात. अंग देशाचा राजा रोमपाल दशरथाचा मित्र! तो पत्नी वर्षिणीसह उदास मनस्थितीत दशरथाकडे गेला. उदासीचे कारण जाणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दशरथास मित्र अपत्य नसल्यामळे उदास असल्याचे कळले. म्हणून त्याने आपली लेक त्यांना अर्पण केली आणि शांता अयोध्येचा निरोप घेऊन अंग देशास गेली.
तिचे उत्तम संगोपन झाले. पुढे विभांडक मुनींच्या ऋष्यश्रृंग पुत्रास शांतेचे कन्यादान केले. कालांतराने दशरथास पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करावा लागला. त्यासाठी ज्ञानी ऋष्यश्रृंग पत्नीसह अयोध्या नगरीस गेले. या यज्ञात त्यांचा सिंहाचा वाटा! रामाने गर्भवती सीतेचा त्याग केल्याचे वृत्त कळताच थोरल्या बहिणीच्या अधिकाराने शांता रामास रागे भरल्याची उत्तर रामायणात नोंद आहे. हिमाचल प्रदेशात, कुल्लू नजिक शांतादेवी मंदिर आहे. तिथे शांतादेवी श्रीरामांची बहीण असल्याचे आवर्जून सांगतात.
तेव्हापासून मनात काही प्रश्न गुदमरत आहेत. शांतेच्या जागी पुत्र असता तर दशरथाने त्यास मित्रास दत्तक दिले असते का? तिच्या पतीच्या यज्ञातील ज्ञान आणि कौशल्यामुळे दशरथास चार पुत्र लाभले. ज्येष्ठ पुत्र गादीसाठी हवा. पण उरल्या तीन पुत्रातील एकास दशरथाने रोमपालास देणे योग्य ठरवले असते तर अंग देशास युवराज आणि शांताला भाऊ मिळाला असता. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा सुविचार दशरथाने का केला नाही? हे प्रश्न वाजवी वाटतात की धर्म ग्रंथांच्या लिखाणावर प्रश्न विचारणे गैर समजता तुम्ही? या चर्चेसाठी मी सर्वांना निमंत्रित करते. या संदर्भात कुणापाशी अधिक माहिती असल्यास ती ब्लॉगवर प्रतिक्रिया लिहून कळवली तर माझ्यासह इतरांनाही ती कळेल, यासाठी ही विनंती.
मनात रुंजी घालणारे इतर प्रश्न आपण पुढे चर्चेत घेऊ. त्यात तुमच्या प्रश्नांचाही समावेश होणेी आवडेल! आता भेटू येत्या आड्यात याच दिवशी. आभार!


विविध पोस्ट वाचून त्या बद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिल्यात या साठी मनःपूर्वक धन्यवाद. सध्याजरा कामाचा लोड अधिकअसल्याने आणि त्याही पेक्षा वयोमानाने दैहिक शक्ती कामाच्या झपाट्यावर कातर फिरवत असल्याने ब्लॉगवर कमी लिहिण्याचे ठरवले आहे. रथयात्रेच्या शुभेच्छा.
फादर्स डे बाबत सांगितलेले मार्गदर्शन अगदी पटलं. येथे अमेरिकेतही काही पालक आढळून आले आहेत,
की जे मुलांना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण घेण्याचा आग्रह करतात आणि परिणामी ते त्याच्यात अयशस्वी होऊन
परत आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात प्रवेश घेऊन प्रगती करतात. काही पालक मुलांचे युनिव्हर्सिटीचे अर्ज
भरून देण्यापासून ते घराबाहेर पडतांना त्यांची बॅग ही स्वत:च भरून देतात. अशांनी हे पुस्तक जरूर वाचावेसे वाटते.
हे टिपण वाचतांना एका गोष्ष्टीची आठवण झाली. माझ्या एका उद्योजक मित्राने आम्ही अमेरिकेत येण्याआधी माझ्या १४ वर्षांच्या मुलाला सहज सांगितले होते.... आता तुला अमेरिकेला जायची संधी आहे. तेथे तुझ्या हुशारीला बराच वाव आहे, तेव्हां जी काही स्वप्नं पाहशील ती नुसती पाहू नकोस पण ती अमलात आणून त्याची पूर्णता कशी होईल ते बघ. कारण त्याने स्वत:नेही अशी स्वप्नं पहिली व अमलात आणली.
आधुनिक म्हणवणाऱ्या पाश्चात्य देशात आजही स्त्रीची ओळख सेकंड सेक्स अशीच आहे. तरी मला वाटतं, त्या आदर्श काळात दशरथाने जावयाचे कौतुक आणि कृतज्ञता म्हणून एक मुलगा शांतास भाऊ म्हणून नि अंग देशास युवराज म्हणून द्यायला हवा होता. तसे केले असते तर दशरथाच्या व्यक्तिमत्वाविषयी आदर निर्माण झाला असता. शिवाय मनात एक प्रश्न आहे,ज्याचं उत्तर बहुतेक सुखद नसावं.शांताला दत्तक देण्यापूर्वी त्याला कौसल्येला औपचारिक तरी विचारण्याची गरज वाटली होती का?
May be because of her contribution (?) In Ramayana, all forgot her. But I am sure if it was boy, Dashrath would Not have given his son. Even in ideal period, sex discrimination prevailed.
May be. Thanks for presenting your views. He might have wrote Ramayan after birth of Shanta. So might have just wrote about her. Still the quiestion - if the child was a son, Dasharath may not have given to his friend Raja Rompal. शिवाय शांताच्या पतिचा यज्ञात सहभाग असल्याने त्यास चार पुत्र प्राप्त झाले होते. त्यास एक मुलगा दत्तक देण्यास सुचले असते तर दशरथाचे व्यक्तिमत्व अधिक लोभस झाले असते, असे मला वाटते, इतकेच मला म्हणायचे आहे.
तरी या संदर्भात विचार करून गंभीरपणे प्रतिक्रिया दिली, हे खूप आवडले. इतकेच सांगते. औपचारिकपणे आभार मानत नाही.